म. ए. सोसायटीच्या आबासाहेब गरवारे कॉलेजच्या नामकरण समारंभात केलेल्या भाषणातूनः, ता. ६ ऑगस्ट, १९७२.
स्वातंत्र्यानंतर बऱ्याचश्या मराठी म्हणींचा अर्थ बदलला. लक्ष्मी आणि सरस्वती यांचे वैर त्या विसरल्या आणि हातात हात घालून देशासाठी प्रयत्नशील राहिल्या. "साठी बुद्धी नाठी" ही म्हणसुद्धा बदलली. आणि वयाबरोबर मिळवलेली अनुभवाची शिदोरी ही भावी पिढीस चालवावयास दिली पाहिजे ही कल्पना रूढ झाली. वयस्कर माणसांनी आपल्या अनुभवाचा फायदा तरुण पिढीला करून दिला तर देशाची प्रगती भक्कम पायावर होत राहील ही जाणीव ठेवून वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी माझी ही अनुभवाची शिदोरी या संस्थेपुढे खुली करायचे मी ठरविले आहे.
मघाशी म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्यानंतर मराठी म्हणींचा अर्थसुद्धा बदलला पण शिक्षणपद्धतीत मात्र बदल झाला नाही. स्वातंत्र्यापूर्वी परकीय मालाची आयात करून त्याची भारतात विक्री करण्यातच धन्यता मानली जात होती, पण युद्धाचा वणवा पेटला आणि काळाची गरज लक्षात घेऊन लहान-मोठ्या कारखान्यांची पायाभरणी या देशात झाली. आणि स्वातंत्र्यानंतर इतकी वेगवान प्रगती या देशाची झाली, की त्या औद्योगिक प्रगतीचा वेग ओळखून शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल व्हावयास हवा होता; तो मात्र झाला नाही.
आज खरोखरच आम्हा कारखानदारांना चांगल्या माणसांची उणीव भासत आहे. अगदी गेल्या आठवड्यात माझ्या एका ऑफिसकरता मला एका तरुण होतकरू अधिकाऱ्याची गरज होती. वर्तमानपत्रात जाहिरात दिली तर सातशे अर्ज आले. निवड समितीने सातशे अर्ज वाचण्याचे व त्यांचा अर्थ समजूत घेण्याचे बिकट काम केले आणि त्यांनी मला जो रिपोर्ट दिला त्यावरून असे आढळून आले, की या सातशे अर्जात आठ दहाच उमेदवार लायक दिसून आले. खरी मजा तर यापुढे आहे. या सातशे अर्जात इंग्रजी स्पेलिंगची चूक नसलेले फारच थोडे अर्ज आढळून आले, आणि त्यापेक्षा खेदाची गोष्ट अशी की जवळजवळ २७५ कॉमर्स ग्रॅजुएटपैकी "लेजर" शब्दाचे स्पेलिंग हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्यांनाच लिहिता आले.
माझ्या अधिकाऱ्यांचा रिपोर्ट वाचून मला गमतीने वाटले, की या निवड समितीवर आमच्या एखाद्या कॉलेजच्या प्रिन्सिपॉलची नेमणूक करावयास हवी होती म्हणजे मग त्यांनाही संभ्रम पडला असता. या सातशे अर्जांपैकी जवळजवळ शंभर उमेदवार निवड समितीने पाहिले. त्यांतील प्रत्येकाची बँकेत किंवा सरकारी नोकरी करण्याची इच्छा दिसली. शक्य आहे! नाहीतर "दोन-अडीच तास काम, बाकी सर्व आराम" कुठे मिळणार! आज गरिबी हटावचे युग आहे आणि खरोखरच ह्या शिक्षणपद्धतीतील दारिद्य, गरीबी जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत गरीबी हटणार कशी?