मराठी विज्ञान परिषदेच्या नागपूर येथील पाचव्या संमेलनाचे उद्घाटक या नात्याने केलेल्या भाषणातून; ता. ५ डिसेंबर, १९७०.
विज्ञानाची व्याख्या वैज्ञानिक काहीही करोत, मी मात्र त्याचा विशेष ज्ञान अथवा विविध ज्ञान असाच अर्थ लावतो; आणि अशा तऱ्हेचे प्रत्येक विषयाचे विशेष ज्ञान प्राप्त करून घेण्याची मानवाची अखंड धडपड चालू आहे. माणसाने सदैव समाधानी असावे असे म्हणतात. पण प्राप्त ज्ञानात समाधानी न राहता प्रयत्नशील राहणे, सदासर्वदा विशेष ज्ञान प्राप्त करून घेणे म्हणजेच विज्ञानाची वाटचाल करणे असे माझे मत आहे.
माझ्या शालेय जीवनात पाठ केलेली एक काव्यपंक्ती मला या क्षणी आठवते. "साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे"...या काव्यपंक्तीप्रमाणे अगदी साध्यासाध्या गोष्टीतसुद्धा किती विशेष ज्ञान दडलेले आहे याची जाणीव या क्षणी होते. लहानपणी आईपाठोपाठ तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालताना, तुळशीच्या श्वासोच्छवासातून निर्माण होणारा वायू हा मानवाला आरोग्यकारक आहे याची जाणीव बालपणी नव्हती. पण ती आज विशेष ज्ञानाने प्राप्त झाली. पूर्वी प्रत्येक स्वयंपाकगृहात अगत्याची असणारी फोडणीची लोखंडी पळी पळाली आणि गेल्या तीस-चाळीस वर्षात फॉर्टिफाइड औषधांची आवश्यकता माणसाला भासू लागली. याचे कारण लोखंडी पळीच्या वापराबद्दलचे विशेष ज्ञान आपण प्राप्त करून घेतले नाही; पण त्याउलट चाळीसपट महाग असलेल्या औषधांच्या संशोधनात आपण व्यग्र झालो. जलोदर, कावीळ, यकृत, रक्तदोष, त्वचाविकार, हृदयविकार, मधुमेह, इ. अनेक विकृतींवर प्रभावी उपाय म्हणून पुण्याच्या संजीवनी औषधालयाने गोमुत्राच्या गोळ्यांचे उत्पादन नुकतेच सुरू केले आहे. श्रावणीच्या दिवशी गोमुत्राचे प्राशन किंवा पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे भक्षण या गोष्टी धार्मिक भूमिकेतून सांगितल्या गेल्या तरी त्याला विज्ञानाचीच बैठक असली पाहिजे.
अशा या बारीकसारीक गोष्टींचा जेव्हा आपण साकल्याने विचार करतो त्या वेळेस वैज्ञानिक प्रगतीतील सिंहाचा वाटा प्रगत पाश्चात्त्य राष्ट्रांकडे देण्याची जी प्रवृत्ती आहे त्याबद्दल खेद होतो. पाश्चात्त्य देशातून ज्या मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक संशोधन चालू आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात आज ते भारतात नाही याबद्दल कोणाचेच दुमत असणार नाही. पण याची कारणपरंपरा शोधून काढण्याची नितान्त गरज आहे. अनेक वर्षे गुलामगिरीने पिचलेल्या भारतीयांची प्रगतीच खुंटली होती. दास्यशृंखला इतक्या करकचून आवळल्या गेल्या होत्या की भारतीय हा गतप्रभ होता. मानखंडना व प्रोत्साहनाचा अभाव यांमुळे सारा उत्साह मावळला होता अशा वेळी पाश्चात्त्य राष्ट्रे मात्र वैज्ञानिक प्रगती साधत गेली. इतकेच नव्हे तर बुद्धिमान अशा भारतीय तरुणांवर विशेष संस्करण करून त्या वेळचे परकीय सरकार त्यांस परदेशात जाण्यास उद्युक्त करीत असे. अर्थात त्यांच्या ज्ञानाचा फायदा त्या परदेशवासीयांनाच होत असे.
स्वातंत्र्यानंतर हे चित्र बदलून गेले आणि स्वतंत्र भारतात अमाप चैतन्याचे अमोल वारे वाहू लागले. प्रतिदिनी नवीन उद्योगधंद्यांची मुहूर्तमेढ रोवली जाऊ लागली. नवे शोध, नवे संकेत प्रसिद्ध होऊ लागले. आणि हे सर्व विज्ञानाच्या घोडदौडीचेच निदर्शक नाहीत का?