माझ्या अनुभवाची गोळाबेरीज, आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून केलेले भाषण
माझ्या अनुभवाची गोळाबेरीज ह्या विषयावर माझ्यासारख्या उद्योगक्षेत्रातील व्यक्तीला विचार मांडण्यास सांगितल्यावर मला असे वाटते, की संयोजकांना असे वाटत असावे की उद्योगक्षेत्रातील माणूस म्हटला की त्याला बेरीज याखेरीज काही माहीत असत नाही. एका अर्थी हे खरं आहे. एका अर्थी खोटंही आहे. व्यापाऱ्याला रोज संध्याकाळी व्यवसाय बंद झाल्यावर दैनंदिन बेरजेची सवय असते. हिशोब करताना चूक आढळून येईपर्यंत तो आपली बैठक सोडीत नाही. चूक दुरुस्त करतो, बेरीज बरोबर आल्याचे पडताळून पाहतो आणि मग सुखासमाधानाने झोपतो. ही सवय खरोखरच चांगली का? दिवसभरच्या व्यवहारात बोलण्याचालण्यात काय चुकलो... काय बरोबर आहे... आपण काय गमावलं काय कमावलं.... याचा जो विचार करतो तोच चूक दुरुस्त करू शकतो. उद्याच्या येणाऱ्या दिवसाकरिता अनुभवाचं गाठोडं उशाशी घेऊन उद्याच्या प्रभातकालाची वाट पाहतो. अनुभव दोन प्रकारचे असू शकतील. एक स्वानुभव. दुसरा परानुभव. परदुःख शीतल असते म्हणतात, पण यातून... दुसऱ्याच्या अनुभवातून... आपण आपल्या बेरजेत किंवा बजाबाकीत वाढ करण्यास शिकलं पाहिजे, हीही एक माझ्या अनुभवाची बेरीजच आहे. पुढच्यास ठेच लागली आणि मागचा शहाणा नाही झाला तर त्याचा बैल रिकामाच.
अनुभवाची गोळाबेरीज हा एक पदार्थ मानला तर ही गोळाबेरीज जितकी जास्त, जितकी जुनी, तितकी ती लोणच्यासारखी मुरलेली म्हणून रुचकर. अनुभवाची गोळा बेरीज ही जरी मेथीची गोळाभाजी नसली तरी अशी गोळाबेरीज गोड आठवणींना कटू अनुभवाची, मेथीची फोडणी दिलेली, अशी कडुगोड असते. आयुष्य म्हणजे जीवन... दोन घडीचा डाव... त्याला जीवन ऐसे नाव... आयुष्याला जीवन का म्हणतात कोणास ठाऊक. पण जीवनाचं, पाण्याचं एक वैशिष्टय आहे. पानी तेरा रंग कैसा? जिसमे मिलावे वैसा... असं पाणी जरी जीवन म्हणून संबोधलं जात असलं तरी समाजाच्या रंगाप्रमाणे आपला रंग बदलणारं जीवन निर्जीव राहील अशीही एक गोळाबेरीज माझ्या अनुभवाच्या चोपडीत नोंदलेली आहे. जीवनाच्या प्रवाहात पतिताप्रमाणे वाहत जाण्यात पुरुषार्थ नाही तर वेळ आली तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत जाण्यातच पुरुषार्थ आहे ही माझी अनुभवातून सिद्ध झालेली धारणा आहे.
आपला हा भारत देश स्वतंत्र होऊन नुकतीच पंचवीस वर्षे होऊन गेली. मी स्वातंत्र्यापूर्वी २५ वर्षे व्यवसायात होतो आणि गेल्या ५० वर्षांच्या बऱ्याबाईट अनुभवांची व्याप्ती फार मोठी आहे. ती सर्वच कथन करणं इथे शक्य नाही म्हणून तर केवळ ही गोळाबेरीज. या गोळाबेरजेत जमेच्या बाजूला, समृद्धीकडे वाटचाल करणारा मरत आहे. स्वावलंबनाचे अनेक तडाखेबंद आकडे या बाजूला आहेत पण वजाबाकीच्या बाजूला, खर्चाच्या बाजूला परंपरेचा साठा संपलेला दिसतोय, नीतिमत्तेची मालमत्ता केव्हाच कर्जबाजारी झालेली दिसतेय. गोळाबेरजेचा हा ताळेबंद काही तितकासा आल्हाददायक नाही.
स्वातंत्र्यापूर्वी हा देश दलालांचा देश म्हणून ओळखला जात होता. परकीय कंपन्यांची दलाली हीच इथल्या व्यावसायिकांची तृप्ती होती. पण स्वातंत्र्यानंतर हा देश दुर्दैवाने दलदलीचा झाला. चारित्र्य तुडवायचं, नीतिमत्ता तुडवायची, चिखलफेक करीत राहायचे; पण चिखलात गाडल्या गेलेल्या नीतिमत्तेच्या गोंडस बालकाला पुनर्जन्म देऊ शकणाऱ्या गोरा कुंभाराची आज देशाला गरज आहे, असाही शेरा अनुभवाच्या ऑडिटर्सनी लाल शाईत मांडलेला दप्तरी दिसतो आहे.
या अधःपतनाची कारणपरंपरा शोधून काढण्यासाठी प्रथम परंपरेवरचा विश्वास जतन केला पाहिजे. आणि परंपरेवरचा विश्वास जतन केल्यावर ज्या समाजात आपण जन्मलो, वाढलो, मोठे झालो त्या समाजाचा विश्वास संपादन केला पाहिजे. ज्या समाजगंगेने आपल्याला जोपासले, त्या समाजगंगेच्या ऋणाची जितकी शक्य आहे तितकी, जेव्हा शक्य आहे तेव्हा परतफेड केली पाहिजे. अशा परतफेडीने कर्तव्य केल्याचा अत्यानंद मिळतो असा माझा अनुभव आहे.
ह्या आनंदाचा अनुभव मला जीवनात उपभोगायला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. गेल्या वर्षीपासून पुण्यातल्या एका शिक्षणसंस्थेशी माझा संबंध आला. त्या शिक्षणसंस्थेतील शाळा-कॉलेजांतील ८-१० हजार विद्यार्थ्यांचे हसरेबोलके चेहरे पाहिले की मन तृप्त होतं आणि अशा स्मृतीचा आनंद फारच आगळा असतो असा माझा अनुभव आहे. मघाशी ज्या दलदलीचा मी उलेख केला ती दलदल थांबवायची असेल तर शालेय जीवनापासून विशिष्ट संस्कार उद्याच्या नागरिकांवर घडवायला हवेत असं मला वाटतं. त्या खुलभर दुधाच्या कहाणीसारखे सर्वानीच पाण्याचे कलश घेऊन जाण्यापेक्षा वाटीभर दूध जरी मंगल कलशात टाकलं तरी "सत्यं शिवं, सुंदरम्" रूपी मंदिराचा गाभारा दुधाने भरून जाईल व आज गाभा नसलेली, मांड नसलेली नीतिमत्ता जोपासली जाईल... शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल होईल. आजचा हीन-दीन उद्या उन्नत असूनही विनम्र राहील.
अगदी सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे उद्योगक्षेत्रातील माणसाला बेरीज याखेरीज काहीही माहीत नसतं हा प्रवाद खराही आहे आणि खोटाही आहे. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे समाजगंगेतून कलश भरभरून संचय, केवळ संचयच करायचा ही भावना अस्तंगत पावली आहे. त्या कलशांनी वाहून आणलेल्या गंगाजलाचे एक अर्घ्य गंगामातेला परत देण्याची परंपरा आहे व परंपरेवर विश्वास ठेवणारा माणूस अशा अर्घ्यदानात आनंद मानतो. कारण त्याला समाजऋण फेडल्याचा आनंद मिळतो, कर्तव्याची कठोर कक्षा पाळल्याचे समाधान लाभते असा माझा अनुभव आहे.
असाच आनंद हाती आलेल्या संधीचा फायदा घेऊन समाजसेवा करण्यात प्राप्त होतो. "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले। तोची साधु ओळखावा... देव तेथेची जाणावा" ही संतोक्ती केवळ उक्ती म्हणून न ठेवता तिचे कृतीवंत अनुयायी होण्यात आयुष्याची सांगता झाल्याचे प्रत्ययास येते आणि म्हणूनच नेहमी बेरीजच करण्यापेक्षा थोडी बजाबाकी सुद्धा करायला शिकलं पाहिजे. अगदी परवा मी सत्तराव्या वर्षात पदार्पण केले त्या वेळी माझ्या मित्रपरिवाराने एक कौटुंबिक शुभाशीर्वादाचा कार्यक्रम आयोजित केला. खरे म्हटले तर असे कार्यक्रम मला आवडत नाहीत. पण काही वेळा इतरांपुढे हार खावी लागते असा माझा अनुभव आहे. त्या कार्यक्रमाच्या वेळी एक विद्यार्थी म्हणाला, "आबासाहेबांनी या संस्थेला आठ लाखांची देणगी दिली त्याचा आनंद आम्हाला आहेच; पण त्यापेक्षा त्यांच्या ५० वर्षाच्या अनुभवाचं भांडार त्यांनी आम्हासाठी खुलं केलं आहे ह्याचा आम्हास अधिक आनंद आहे!" माझ्या अनुभवाची ही वजाबाकीसुद्धा सुखद नाही का! अशी वजाबाकी नेहमीच करावी लागते. माझ्या अनुभवाची गोळाबेरीज उपयोगी पडावी म्हणून म्हणा किंवा लष्करच्या भाकऱ्या भाजायला दुसरं कोण मिळणार या विचाराने म्हणा, माझी नेमणूक शासनाने महाराष्ट्र स्टेट फायनेंन्शियल कॉर्पोरेशनचा अध्यक्ष म्हणून तसेच स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या स्थानिक संचालक मंडळाचा अध्यक्ष म्हणून लागोपाठ १०-१२ वर्षे केली. ह्या लोकोपयोगी कार्याचा विस्तार मी माझ्या अनुभवातून केला. नाना क्षेत्रांतील अनेकविध माणसे त्या निमित्ताने मी फार जवळून पाहिली.
अनेकांची मते, त्यांचे विचार ऐकून घेतले, माझे विचार त्यांच्यापुढे मांडले आणि या सर्व अनुभवांची गोळाबेरीज करताना मला असे आढळून आले, की सर्वच क्षेत्रांत फार गुणी माणसं आहेत. अशा गुणी माणसांचा संग्रह करण्यासाठी त्या त्या व्यक्तींची वैशिष्टय जाणून घेऊन, त्यांच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना करून, प्रगतीची संधी देऊन, क्षम्य चुका हळुवारपणे समजावून सांगून माणसं सतत जोडत राहिली पाहिजेत, म्हणजे त्या गुणी व्यतीलाही कृतार्थतेचा आनंद मिळतो असा माझा अनुभव आहे.
हे परिश्रमपूर्वक करायला मन सदासर्वदा सतेज असावे लागते. वाढत्या वयाबरोबर जबाबदाऱ्या वाढत असतात आणि दुबळे शरीर मन दुर्बळ करते. यासाठी प्रत्येकाने सबळ आगि सुदृढ असावे असे मला वाटते. शरीराचा बळकटपणा मनालासुद्धा खंबीरपणा आणतो व वयाची सत्तरी ओलांडली तरी बारा-चौदा तास काम करण्याची उमेद राहते हा अनुभव मोलाचा आहे.
मी ज्या ज्या वेळी माझ्या अनुभवाची शिदोरी उघडली त्या त्या वेळी मला निष्ठेने व तत्परतेने काम केल्याने अनेकदा फायदाच होतो असे लक्षात आले.
बोलू नको, ऐकू नको, पाहू नको ही चांगल्या आचाराची तत्त्वे माकडांच्या द्वारे मानवाला शिकविण्याचा प्रयत्न कोणी केला ते मला माहीत नाही; पण माझ्या अनुभवावरून मला तरी असं वाटतं, की जे जे चांगले असेल ते ते उघड्या डोळ्यांनी खुशाल पाहा, जे जे पवित्र असेल, मंगल असेल, श्रवणीय असेल ते ते बिनदिकत ऐक व सदैव चांगले बोल... हीच कदाचित माझ्या अनुभवाची गोळाबेरीज आहे.
वा. दि. १५ जुलै, १९७३ रोजी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून केलेले भाषण.