'स्वराज्य' कामधंदा विशेषांक, २६ जानेवारी, १९७१.
उद्योगधंद्याची वाढ कशी होईल आणि सध्या याबाबत काय प्रयत्न चालू आहेत यासंबंधी पुण्याच्या "स्वराज्य" साप्ताहिकाच्या संपादकांना दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलेले विचार:
उद्योगधंद्याच्या वाढीचा आढावा घेताना श्री. आबासाहेब म्हणाले, की आपण सर्वप्रथम आपला इतिहास पाहिला पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात परकीय वस्तूंची आयात करून त्याची भारतात विक्री करणे हाच बहुधा सर्वमान्य व्यवसाय होता. पण स्वातंत्र्यानंतर सर्वत्र औद्योगिक वाढ फार झपाटयाने होऊ लागली. सर्वप्रथम अनेक छोट्यामोठ्या उद्योगधंद्यांची गर्दी मुंबई नगरात होऊ लागली. त्यानंतर शहराजवळच मोठे उद्योगधंदे सुरू करण्यात आले. उद्योगधंद्याच्या वाढीसाठी औद्योगिक प्रवृत्तीचे बीजारोपण या मोठ्या धंद्यांमुळे महाराष्ट्रात झाले. उद्योगधंद्यांच्या निर्मिती साठी कामगारांची आवश्यकता असतेच पण ज्या ठिकाणी कारखाना उभारला जाईल तेथे स्थानिक कामगार मिळू शकतात व थोड्याशा मार्गदर्शनानंतर ते नीट काम करू शकतात. पण उद्योगधंद्यांच्या उत्कर्षांचे मर्म हे चांगला अधिकारी वर्ग व कुशल पर्यवेक्षक यांच्यातच आहे.
ज्याप्रमाणे मध्यमवर्ग हा समाजाचा कणा मानतात त्याचप्रमाणे अधिकारी वर्ग व पर्यवेक्षक हा कुठल्याही उद्योगधंद्याचा कणाच आहे, म्हणून कामगारांच्या कल्याणकारी योजनांबरोबरच या वर्गाच्या सुखसोयींकडे पाहणे, त्यांना सवलती देणे वगैरे केल्याने ह्या देखरेख करणाऱ्या व्यक्तींस प्रोत्साहन मिळते. ह्याबाबत एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, की इंग्लंड, युरोप आदी पाश्चात्त्य देशात ज्या वेळी औद्योगिक क्रांती झाली त्या वेळी मध्यमवर्गाकडे दुर्लक्ष झाले व त्याचे दुष्परिणाम बराच काळ टिकले. अशा वर्गाचे संरक्षण, परिवर्धन हे सफल उद्योगाचे मर्म समजण्यास प्रत्यवाय नाही.
ते पुढे म्हणाले, की उद्योगधंदे यशस्वी करण्याकरिता काही गोष्टींची नितान्त आवश्यकता आहे. सरकार ज्या तऱ्हेने या बाबतीत प्रयत्नशील आहे त्या चाचणीत सुद्धा छोट्या व मोठ्या उद्योग धंद्यांच्या, एकमेकांपासून फार दूर नाहीत व अती जवळही नाहीत अशा वसाहती आवश्यक आहेत. याचे कारण छोट्या उद्योगधंद्यात काम करणारे कर्मचारी हे मोठ्या उद्योगधंद्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी, सवलती वगैरे बाबत अपेक्षा करून असंतुष्ट राहतात व त्याचा परिणाम पर्यायाने औद्योगिक शांततेवर होतो. उद्योगधंद्यांच्या वाढीबाबत विचार करताना श्री. आबासाहेब म्हणाले, की नागरी वसाहत हा जर केंद्र बिंदू मानला तर त्याच्या १०-१५ मैलांच्या परिसरात उद्योग धंद्यांचे जाळे आणि कडे असणे आवश्यक आहे. पुण्याची औद्योगिक प्रगती या विचाराच्या दिशेशी जुळती दिसून येईल आणि हेच नेमके मुंबईत न झाल्याने मुंबईच्या सामाजिक जीवनात अनेक प्रश्न निर्माण झाले.
मोठा कारखाना वटवृक्षाप्रमाणे अनेक छोट्यामोठ्या कारखान्यांना आधारभूत ठरतो. अशा मोठ्या कारखान्यांच्या छत्राखाली जे लहान व मध्यम कारखाने उभे राहू इच्छितात त्यांना अनेकविध सवलती उपलब्ध करून देणे ही आजची मोठी गरज आहे. अशा उद्योगधंद्यांना पाणी, वाहतुकीची साधने, इ. अल्प दरांत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कारण सार्वजनिक क्षेत्रातील किंवा मोठया कारखानदारांना त्यांच्या उद्योगातून नफा मिळण्यास थोडा वेळ लागला तरी चालतो. परंतु लहान कारखान्यांना अशा तऱ्हेने त्वरित नफा मिळणे आवश्यक असते, म्हणून आनुषंगिक बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी ही सरकारवर पडते.
आपल्या बागेत आपण छोटेसे रोपटे लावले तर त्याची वाढ होण्याकरता आपण आधार देतो, तसेच छोट्या उद्योगधंद्यांच्या वाढीकरता आर्थिक साहाय्यासहित सर्व साहाय्य अपेक्षित आहे.
उद्योगधंद्यांच्या उत्कर्षाच्या मर्माबाबत आपले काही विचार प्रकर्षाने मांडताना आबासाहेब म्हणाले, की उद्योगधंद्यांच्या विकासाकरिता उद्योगप्रिय वातावरण आवश्यक आहे. ज्या ज्या ठिकाणी प्रमुख बाजारपेठा आहेत त्या त्या ठिकाणी ह्या उद्योगी प्रवृत्ती जोपासल्या गेल्या, म्हणून मोठ्या उद्योगधंद्यांतून शिकून तयार झालेल्या लोकांनी बाहेर पडून स्वतंत्रपणे पूरक व्यवसाय सुरू केले तर खंत वाटण्याचे काहीच कारण नाही; कारण अशा नवीन पूरक उद्योगधंद्यांनी त्या प्रगत उद्योगधंद्यांची पाळेमुळे जोमात येतात.