"कुटुंबनियोजन कार्यात उद्योगपतीचे स्थान": ता. १२ एप्रिल, १९६८ रोजी आकाशवाणीवरून केलेल्या भाषणातून.
औद्योगिक कामगारांत कुटुंबनियोजन कार्याचा प्रसार करण्याच्या दृष्टीने कामगारविषयक कायद्यात जरूर त्या दुरुस्त्या सरकारने ताबडतोब करणे आवश्यक आहे. ह्या कायद्याने भरपगारी बाळंतपणाच्या रजेसारख्या ज्या काही सवलती कामगारांना देऊ केल्या आहेत त्यांचे क्षेत्र दोन किंवा तीन मुलांपर्यंत मर्यादित ठेवले पाहिजे. अर्थात केवळ दुरुस्त्या करण्याने कार्यभाग साधण्यासारखा नाही. त्याकरिता उद्योगपतींच्या सक्रिय प्रोत्साहनाची गरज आहे. शल्यचिकित्सेसाठी भरपगारी रजा आणि पुरस्कारासारख्या सवलती देऊन उद्योगपतींना आपल्या कामगारांना कुटुंबनियोजनासाठी प्रवृत्त करता येणे शक्य आहे.
भ्रामक समजुतींचे निराकरण ही नियोजन कार्याची सुरुवात असते व त्याकरिता उद्योगपतींनी प्रभावीपणे प्रचारकार्य करणे अत्यंत जरूरीचे आहे. ह्याकरिता थोडा आर्थिक बोजा उचलावा लागेल हे खरे पण उद्योगपतींनी त्याकडे खर्चाच्या दृष्टीने न पाहता भविष्यकाळासाठी राष्ट्रीय तरतूद म्हणून पाहणे आवश्यक आहे. कारण आपल्या देशाचे भावी स्वास्थ्य या कार्याच्या यशावर अवलंबून आहे. यासंबंधी विधायक स्वरुपाचा परिणाम साधण्याकरिता प्रत्येक उहान-मोठ्या कारखान्यात कुटुंबनियोजनाच्या पुरस्कारासाठी एखादी समिती नेमली जावी. या समितीवर कामगार, अधिकारी वर्ग आणि संचालक यांचे प्रतिनिधी असावेत. या समितीने कुटुंबनियोजन कार्याचा प्रचार करण्याच्या दृष्टीने कारखान्यातील व्यक्तीची माहिती गोळा करून तज्ज्ञांची व्याख्याने, फिल्म आणि स्लाईड्स यांची प्रात्यक्षिके आयोजित करावीत आणि नियोजनविषयक साधनांचा उपयोग, व त्या संबंधीची माहिती द्यावी व शंकांचे निवारण करावे. केलेल्या कार्याचा प्रत्येक बारा महिन्याला आढावा घेतल्यास प्रगतीची कल्पना येऊ शकेल.