महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स येथील सत्कार समारंभात
"कृतज्ञता शब्दांनी व्यक्त करता येत नाही हे खरं. आयुष्यात असे काही मोजकेच प्रसंग असतात की ज्या वेळी अमृताचीही पैज जिंकणारे मायबोलीचे शब्द निःशब्द होतात.
"आजचा प्रसंग त्यातलाच आहे. आणि म्हणूनच माझी परिस्थिती फार बिकट झाली आहे. आधीच्या वक्त्यांनी दाखविलेल्या अपार प्रेमानं मी अक्षरशः भारावून गेलो आहे आणि खरं म्हटलं तर शब्द बाहेर पडतच नाहीत ही माझी विवंचना आहे. अध्यक्षांच्या भाषणानंतर मी उठून आपणांस अभिवादन करायचं, आपल्या शुभेच्छा मागायच्या आणि पुन्हा बसायचं असं मी योजलं होतं, पण रुढीप्रमाणे निदान चार शब्द तरी बोलणं क्रमप्राप्त आहे. पाश्चात्य पद्धतीत ज्याप्रमाणे रुचकर जेवणानंतर "स्वीट डिश " घेतात आणि नंतर कडू कॉफीचा एक घोटही चाखला जातो त्याचप्रमाणे लज्जतदार भाषणं, त्यानंतर प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या भाषणांची "स्वीट डिश" आणि मग माझ्या भाषणाचा हा छोटासा कॉफीचा कप आहे, तो गोड मानून घ्यावा ही विनंती.
"माझ्यावरील व माझ्या कुटुंबावरील अमाप प्रेमामुळे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्ससारख्या नामवंत, मार्गदर्शक संस्थेनं हा समारंभ आयोजित केला ह्याबद्दल मी खरोखरच ऋणी आहे. माझ्या पत्नीचा व माझा येथे गौरव करण्यात आला, या समारंभाची आठवण म्हणून आम्हा उभयतांस भेट देण्यात आली, गौरव ग्रंथ प्रकाशित करून, लोक माझ्याबद्दल काय बोलतात व लिहितात ते जाणून घेण्याची संधी दिली याबद्दल मी कृतज्ञ आहे. वास्तविक अशा प्रकारे सत्कार व्हावा अशी माझी मुळीच इच्छा नव्हती. सत्तर वर्षे पूर्ण झाली म्हणून सत्कार ही कल्पनाच मला रुचत नव्हती. पण आयुष्यात कधी कधी माघार घ्यावी लागते. अशीच माघार मी आमच्या पुणे-मुंबईच्या कामगारांपुढे घेतली. पद्मभूषण हा किताब मिळाल्याबद्दल त्यांनी असाच माझा सत्कार केला.
आणि आता माझे जिद्दी मित्र श्री. माधवरावजी आपटे, श्री. राम मोहाडीकर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांपुढे माघार घ्यावी लागली आणि आजचा हा सत्कार समारंभ साजरा झाला. माणसाला जीवनात माघार घ्यावी लागली तर खेद होतो... खंत वाटते, पण ह्या माघारीचा मला अभिमान वाटतो, कारण ही माघार निर्व्याज प्रेमापोटी घ्यावी लागली. हो, पण नाही तरी, आता सत्तरी गाठल्यानंतर माघार घेऊन जबाबदारीनं 'आगेकूच' करणाऱ्या मुलांची, अधिकाऱ्यांची, कामगारांची जिद्द पाहून, गरुडझेप पाहून, कृतकृत्य होऊन शेवटच्या बाकावर बसायला मला आनंदच वाटेल !
"पण तरुणपणी मात्र परिस्थितीचा बाऊ करून माघार घ्यायला मला कधीच आवडलं नाही. 'स्थितीचा असे किंकर प्राणिमात्र, स्थिती तया करी पात्र किंवा अपात्र’ ह्या निराशाजनक काव्यपंक्ती कोणी रचल्या हे मला माहीत नाही, पण परिस्थिती, गरिबी, दारिद्र्य ह्या गोष्टी भावी उज्ज्वल जीवनाच्या दृष्टीने एक वरदानच आहेत असं मला वाटतं. गरिबी ही प्रगतीच्या मार्गातील धोंड कधीच असू शकत नाही. पण संकटाशी सामना करण्याची जिद्द हवी. जीवन म्हणजे गुलाबपुष्पांचा मार्ग नव्हे. तो तर काटेरी मार्ग. संकटं ही यायचीच, परंतु येणारी संकटं ही शाप नसतात. प्रगतीच्या प्राथमिक अवस्थेत, अशी संकटं ही उज्ज्वल भवितव्याची निदर्शक असतात. संकटं ही प्रयत्न करणाऱ्याला स्फूर्ती नि साहस देतात असं मला वाटतं.
"संकटातून मार्ग काढता काढता जशी स्फूर्ती मिळते तशीच स्फूर्ती मित्र, हितचिंतक व दूरदृष्टीने राष्ट्र उभारणीचे कार्य करणारे देत असतात. अशीच स्फूर्ती नामदार यशवंतरावजींनी ह्या महाराष्ट्राला दिली. ते आजच्या समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत. पण उद्यमशीलतेचं, उद्योगप्रियतेचं, नवपर्व त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सुरू केलं. त्यांच्या प्रोत्साहनाने, प्रेरणेने पुणे-मुंबईची औद्योगिक क्रांती झाली. शंतनुराव, लालचंदभाई, डहाणूकर, आपटे असे अनेक उद्यमी प्रेरित झाले. पिंपरीसारख्या उजाड माळरानात नायलॉनच्या धाग्याचं भारतात प्रथमच आम्ही जे उत्पादन केलं ते त्यांच्याच प्रेरणेनं. आज मुंबईहून पुण्यास जाताना देहूनंतर दुतर्फा बहरलेली कारखानदारी पाहिली की यशवंतरावजींच्या दूरदृष्टीचं कौतुक करावंस वाटतं. ह्या दूरदृष्टी बरोबरच माणसं हेरून कामाला लावायची, कार्यरत करायची, हे त्यांचं दुसरं वैशिष्टच. ह्या वैशिष्टयामुळेच महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाची स्थापना त्यांनी माझ्याकरवी घडवली.
"यशवंतरावजींनी मोठ्या विश्वासाने हाती दिलेला हा वसा नामदार वसंतरावजी मोठ्या जिद्दीनं, नेटानं, सातत्यानं पुढे नेत आहेत. आता संपूर्ण महाराष्ट्रातील कारखानदारीबरोबरच शेतीव्यवसायाची प्रगती त्यांनी साधली आणि साऱ्या क्षेत्रात चैतन्याचे नवे वारे भरले. अभिमानाची गोष्ट अशी की इतर राज्यांचे मुख्यमंत्री संकटाच्या वेळी वसंतरावांशी सल्लामसलत करतात, इतकंच नव्हे तर कधी पंतप्रधानसुद्धा इतर मुख्यमंत्र्यांना तसं सुचवतात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला, नवोदित व प्रगत कारखानदाराला, याची पुरेपूर जाणीव आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र न थांबता सारखा पुढे पुढे जात आहे. ‘थांबला तो संपला’ याची जाणीव जशी यशवंतरावांना आहे तशी उद्योगक्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे. आणि म्हणूनच एकाहत्तराव्या वर्षात पदार्पण केलं तरी न थांबता पुढेच जात राहावं असं वाटतं. सत्कारापेक्षा सत्कार्य करीत राहावंसं वाटतं. म्हणूनच आजच्या ह्या सत्काराला मी तयार नव्हतो. पण माघार घेतली. सत्कार झाला, तेव्हा त्यानिमित्त माझ्या गतजीवनाकडे थोडंसं मागे वळून पाहणं आवश्यक आहे असे मला वाटतं. स्वानुभवाचं कथन करताना, कदाचित त्याला आत्मप्रौढीची झालर लागली आहे असं आपणांस वाटेल, पण आपण गैरसमज करून घेणार नाही अशी माझी खात्री आहे.
आजची तरुण पिढी ज्या वयात थोडीसुद्धा जबाबदारी अंगाबाहेर टाकते त्या वयात मला नोकरीसाठी मुंबईत यावं लागलं. ‘कशासाठी पोटासाठी... खंडाळ्याच्या घाटासाठी’ असं म्हणत, धडपडत माझ्या जीवनाची 'फुलराणी', बालगाडी मुंबईत येऊन थडकली. आणि तेव्हापासून गेली ५३-५४ वर्षे परिस्थितीशी झगडत, जीवनाला उभारी देत आलो. लहानपणी कृष्णेच्या काठी बसून नदीत सोडलेल्या दिव्यांची दिशा मी मुंबईत अनुभवत होतो आणि म्हणून, एकाकीपणे का होईना, माझा जीवनदीप प्रवाहात वाहत न जाता, भोवऱ्यात न सापडता, पैलतीरी कसा जाईल ह्याबाबत मी प्रयत्नशील राहिलो. संधीची येणारी लहानमोठी लाट मी नीट न्याहाळली आणि त्यामुळेच हा जीवनदीप संधीच्या लाटेबरोबर पुढेपुढे जाऊ लागला. कौशल्याने संधीची वाट पाहत, लहानसहान संधी प्राप्त करीत राहिलं तर माणूस यशस्वी होतो असा माझा अनुभव आहे. खरं म्हटलं तर जीवनातला प्रत्येक क्षण म्हणजे एक सुसंधी आहे. येणाऱ्या प्रत्येक संधीला नम्र अभिवादन केले तर अंगी नम्रता जोपासली जाते. मित्र जोडण्याची कला साध्य होते. ज्योतीनं ज्योत पेटते पण त्यासाठी ज्योत जवळ न्यावी लागते. अगदी तसंच दुसऱ्याच्या भावना समजावून घ्याव्या लागतात, हृदयाला हृदय भिडवून... मधमाश्यांसारखं, प्रत्येक लहान मोठ्या फुलातून मधुगुण संकलित करून, ह्या विचारानं माणसे जोडली. अनंत ज्योती पेटविल्या... त्या अखंड तेवत ठेवल्या... आजच्या सत्काराच्या प्रेमाचं मशालरूप ही त्याचीच साक्ष आहे.
भारताला जरी स्वातंत्र्य मिळालं तरी श्रमाविण देशाची प्रगती होणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ज्या देशात श्रमाची लाज वाटते तो प्रगती करू शकणार नाही. श्रमासारखं दुसरं दैवत नाही. कारखानदारांच्या भाषेत बोलायचं झालं तर वर्तमानकाळ एक कच्चा माल आहे. हवा असलेला पक्का माल योग्य त्या श्रमाचे मोल देऊन तयार करायचा आहे. पैशापेक्षाही, काटकसरीनं वेळ खर्च करून हे उत्पादन अखंड उत्साहानं साधावं लागतं; कारण उत्साह आपल्यासमोर येणाऱ्या संकटांना मुळीच जुमानत नाही. दररोज उत्साहाला अनुभवाची जोड मिळते आणि मग अनुभवी उत्साह ७१ व्या वर्षीही माणसाला आव्हान देत असतो.
"असंच काळाचं आव्हान आज तरुणांना आहे, नव्या तंत्रज्ञांना आहे, नव्या संशोधकांना आहे. महाराष्ट्रातल्या उद्यमप्रिय शक्तींना संघटित करून त्यांना मोलाचे साहाय्य महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ही संस्था करीत आहे. कारखानदारांसाठी आणखी काही मार्गदर्शक सोयी उपलब्ध करता याव्यात अशी चेंबरची आणि माझी इच्छा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत.
काळाचं असंच आव्हान आज शाळा कॉलेजात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना शिक्षण देणाऱ्या शिक्षणसंस्थांना आहे. जीवनोपयोगी शिक्षण व त्यासाठी परिश्रम ही आजची गरज आहे. मघाशी म्हटल्याप्रमाणं सत्कारापेक्षा काही सत्कार्य माझ्या हातून घडावं असं मला वाटतं; त्या दृष्टीने गेल्या चारपाच वर्षात जे जे मला शक्य झाले ते ते मी जनतेच्या सेवेस-समाजगंगेस अर्घ्य म्हणून अर्पण केलं आणि यथाशक्ती पुढे करीत राहीन.
आज ईश्वरकृपेने माझ्या उद्योगाचा पसारा वाढला आहे. सुदैवानं जनतेचा विश्वास माझ्या संस्थेने संपादन केला आहे आणि त्याच जोरावर संस्था एकसारखी प्रगतीही करीत आहे. पण केवळ मी 'आबा गरवारे' आहे म्हणून हे चाललं आहे अशी मात्र माझी भावना मुळीच नाही. कुणाचीच ती नसावी. माझ्या मुलांना, अधिकाऱ्यांना व कामगारांना माझं हेच सांगणं असतं, की व्यक्तीपेक्षा संस्था मी नेहमीच महत्त्वाची मानतो. संस्था चालली पाहिजे... वाढली पाहिजे आणि संस्था भ्हणजे कोणी एक व्यक्ती किंवा कारखान्यातील मशीन्स नाहीत अथवा उंच उभारणी व भक्कम भिंती नाहीत. संस्था म्हणजे त्यासाठी काम करणारे सर्व लोक. माझा एकेक कामगार व एकेक अधिकारी आपापल्या परीने 'आबा गरवारे' झाला पाहिजे हीच माझी इच्छा व माझा प्रयत्न आहे.
"आयुष्यातल्या माझ्या साऱ्या प्रयत्नांत आपल्या सर्वांच्या अलोट प्रेमाचा मोठा वाटा आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळेच मी आयुष्यात प्रगती केली. आजपर्यंत जे काही मी मिळवलं त्याबद्दल मी पूर्ण समाधानी आहे. जे काही मी गमावले त्याबद्दल मला खंत नाही, कारण तो माझा स्वभाव नाही. माझ्या कुवती प्रमाणे जे जे मला माझ्या संस्थेसाठी, राज्यासाठी, राष्ट्रासाठी करणं शक्य आहे ते ते मी केलं, करीत राहीन; पण ह्यासाठी आपल्या सर्वांचं उदंड प्रेम चिरंतन राहो हीच प्रार्थना !
"पुन्हा एकदा मला व माझ्या पत्नीला बोलावून आपण माझा गौरव केलात त्याबद्दल आभार मानून मी आपली रजा घेतो."