वाचनाची खरी कसोटी, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या स्नेह-संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या भाषणातून
चांगल्या प्रकारच्या वाचनाची आवड ही प्रयत्नपूर्वक निर्माण करावी लागते. माणूस दोन तास घालवून सिनेमा पाहतो तेवढ्या वेळात एखादे चांगले पुस्तक वाचतो असे नाही. त्या दृष्टीने आपण ज्या ग्रंथसंपदेची वाचकांना ओढ लावाल, ज्यांनी ते आकर्षून जातील तशी त्यांची प्रवृत्ती होईल. राष्ट्रप्रेमाची भक्ती आपण निर्माण करू शकाल आणि तंत्रज्ञानाची, व्यापारी माहितीची, औद्योगिक जीवनाची आवड निर्माण करू शकाल आणि भावी राष्ट्र उभारण्यात प्रत्यक्ष मदत केल्याचे श्रेय आपल्याला मिळू शकेल. ग्रंथसंपत्ती टिकविणे हे कार्य महत्त्वाचे आहे, पण केवळ संख्येवर त्याचे मूल्य अवलंबून नाही एवढेच मला म्हणायचे आहे. वाचण्याची कसोटी त्याच्या परिणामावर आहे. त्यातून कोणती भावना, आवड, प्रवृत्ती, ओढ निर्माण होणार आहे? ग्रंथपाल व मार्गदर्शक यांची योजना त्या दृष्टीने झाली पाहिजे.
ज्ञानदानाच्या या क्षेत्रात पक्ष अथवा वर्ग यातील मतभेद बाजूला ठेवून कार्य झाले पाहिजे. सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनीही यात प्रामुख्याने भाग घेतला पाहिजे. या सांस्कृतिक कार्याबद्दल सर्वांगीण प्रेम निर्माण झाले पाहिजे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे हे सर्वसंमत असे विधायक कार्य आहे.