सन १९४४-४५ पर्यंत आबासाहेबांनी मोटार व्यवसाय चालू ठेवला. मात्र, या व्यवसायात त्यांचे आता मन लागत नव्हते. कोणता तरी नवा आणि वैशिष्ट्यपूर्ण उद्योग सुरू करावा, असे विचार त्यांच्या मनात घोळू लागले. आपण कोणता उद्योग सुरू करू शकतो, याची यादी त्यांनी प्रथम तयार केली. नवा व्यवसाय सुरू करणे जितके सोपे वाटते, तितकेच योग्य उद्योगाची निवड करणे कठीण असते. माणूस जितका विचार करू लागतो, तितका त्याच्या मनातील गुंता वाढत जातो. आबासाहेबांच्याही बाबतीत तसेच झाले. अखेर सखोल विचारांती त्यांनी प्लॅस्टिक उद्योगात पदार्पण करण्याचे ठरवले.
याला कारणही तसंच घडलं. १९५७ मध्ये भारताचे तत्कालीन अर्थमंत्री, डी. टी. कृष्णम्माचारी यांनी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे परदेशात एक शिष्टमंडळ पाठवलं. आबासाहेबांची शिष्टमंडळाचे सभासद म्हणून नियुक्ती करण्यात आली. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, फ्रांस अशा अनेक देशातून हे शिष्टमंडळ ९ महिने फिरून आले व प्लॅस्टिक उद्योगाबद्दल त्यांनी माहिती गोळा केली. शिष्टमंडळ, प्लॅस्टिकचे उत्पादन भारतात सुरु होणे आवश्यक आहे या निष्कर्षाप्रत आलं. प्लॅस्टिकचे उत्पादन खाजगी क्षेत्राकडे सोपवावं असंही ठरवण्यात आलं. शिष्टमंडळाच्या अहवालाने आबासाहेब प्लॅस्टिकच्या उत्पादनास प्रेरित झाले.
त्या काळात प्लॅस्टिककडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन फारसा अनुकूल नव्हता. अनेकजण याला कमी दर्जाचे समजत आणि नापसंती दर्शवत. काहीजण तर याला "कचकड्याचे" म्हणून हिणवत आणि टिकाऊपणाबद्दल शंका व्यक्त करत. ही मानसिकता आबासाहेबांना माहीत होती, पण त्यांची दूरदृष्टी वेगळी होती. पुढील तीस-चाळीस वर्षांत या उद्योगाचा कायापालट होईल, हे त्यांनी आधीच ओळखले होते. प्लॅस्टिक हा उदयोन्मुख उद्योग ठरेल, याची खात्री असल्याने त्यांनी या क्षेत्रात उडी घेतली. स्वदेशी उद्योगधंद्यांना चालना देऊन देशाचे परावलंबित्व कमी करावे, ही त्यांची तीव्र इच्छा होती.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी नौदलासाठी प्लॅस्टिक बटणांची निर्मिती सुरू केली. त्या काळात देशात स्वातंत्र्यसंग्रामही तेजीत होता. महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव आबासाहेबांवर होता आणि त्यांनी त्या विचारांचा स्वीकारही केला होता. उद्योगात आपले स्थान प्रस्थापित करत असतानाच ते गांधी विचारांच्या पाईकत्वाचे कार्य करत होते. भारतामध्ये थर्मोप्लॅस्टिक उद्योगाची मुहूर्तमेढ रोवून, त्यांनी नायलॉन व सिंथेटिक फायबर क्षेत्रात यशस्वी प्रवेश केला. स्वातंत्र्योत्तर काळात 'हाउस ऑफ गरवारे' या नावाने त्यांची प्रगती भारताच्या औद्योगिक इतिहासात महत्त्वाची ठरली. प्लॅस्टिक उद्योगाचे ते अग्रणी ठरले.
'गरवारे नायलॉन्स लिमिटेड' ची स्थापना ६ जून १९५७ रोजी "प्लॅस्टिक्स पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड" या नावाने झाली. नंतर त्याचे नाव बदलून "गरवारे नायलॉन्स लिमिटेड" करण्यात आले. १९५८ मध्ये मुंबईतील वरळी येथे नायलॉन धागा आणि मोनोफिलामेंट्स तयार करणारा कारखाना सुरू झाला. १९६२ मध्ये आयात केलेल्या नायलॉन चिप्सवर प्रक्रिया करून चिंचवड येथे नायलॉन फिलामेंट यार्नचे उत्पादन सुरू झाले. त्याकाळी चिंचवड काही तेव्हा एवढं मोठं नव्हतं. ना वीज ना अन्य सोयी ! परंतु याकाळात आबासाहेबांनी लहानश्या एका झोपडीवजा खोलीत आपलं बिर्हाड मांडलं. १९६५ मध्ये कंपनीने स्वतःचे पॉलिमरायझेशन युनिट स्थापन केले आणि देशातच नायलॉन चिप्स तयार करण्यास सुरुवात झाली. या प्रकल्पामुळे भारतात नायलॉनच्या आयातीवर निर्भरता कमी झाली. सुरुवातीला मासेमारी जाळ्यांसाठी आणि पॅराशूट दोऱ्यांसाठी लागणाऱ्या विशेष चिवट सुताचे उत्पादन सुरू झाले. पुढे विविध औद्योगिक क्षेत्रांसाठीही हे सूत वापरले जाऊ लागले. गुणवत्तेच्या बळावर 'गरवारे नायलॉन्स' हे नाव प्रसिद्ध झाले. देशांतर्गत उत्पादनामुळे आयात खर्चात मोठी बचत झाली आणि निर्यात वाढून परकीय चलनात भर पडली.
पॅराशूटसाठी लागणाऱ्या दोऱ्यांच्या निर्मितीतून संरक्षण क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. विशेष म्हणजे, पिंपरीतील या प्रकल्पात एकही परदेशी तंत्रज्ञ नव्हता. सर्व उत्पादन भारतीय तंत्रज्ञांच्या ज्ञानावर आधारित होते. ही देशासाठी अभिमानाची बाब होती. 'गरवारे समूह' हा नायलॉन धाग्याच्या स्वदेशी उत्पादनातील अग्रणी ठरला. त्यांनी आयात पर्यायीकरणाला चालना दिली आणि कृत्रिम तंतू उद्योगाच्या विकासात मोलाचे योगदान दिले. पारंपरिक वापराशिवाय मासेमारी, सागरी, औद्योगिक क्षेत्रांमध्ये नायलॉनचा उपयोग वाढवण्यासाठी त्यांनी तांत्रिक सुधारणांवर भर दिला. यामुळे रोजगारनिर्मिती झाली आणि स्वदेशी साहित्य उपलब्ध झाल्याने आर्थिक विकासाला चालना मिळाली. त्यांचा विस्तार नायलॉन धागा, नायलॉन ब्रिस्टल्स, फिशिंग नेट्स, पॉलिस्टर फिल्म्स, सिंथेटिक दोर, प्लॅस्टिक इंजेक्शन मोल्डिंग, ब्लो मोल्डिंग अशा विविध उत्पादनांपर्यंत गेला. गुणवत्ता आणि नाविन्य यामुळे त्यांना देश-विदेशात यश मिळाले. संरक्षण, मासेमारी आणि औद्योगिक क्षेत्रात त्यांनी भक्कम स्थान मिळवले.
आबासाहेब केवळ उद्योगपती नव्हते, तर इतर उद्योजकांना मार्गदर्शन करणारेही होते. 'महाराष्ट्र स्टेट फायनान्शिअल कॉर्पोरेशन'चे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक नवउद्योगांना भांडवलसाहाय्य उपलब्ध करून दिले. विशेषतः तळागाळातील होतकरू तंत्रज्ञांसाठी योजना राबवून, त्यांनी औद्योगिक संधी निर्माण केल्या.
त्यांचे कामगारांशी असलेले नाते हे मालक-कामगाराचे न राहता, कुटुंबातील सदस्याचे होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य असायचे. या संदर्भात आबासाहेबांची एक गोष्ट विशेष उल्लेखनीय आहे. आबासाहेब आणि त्यांची कन्या प्रभाताई यांनी ‘गरवारे प्लॅस्टिक’ या कंपनीला भेट दिली होती. त्या वेळी सर्व यंत्रे कार्यरत होती आणि सर्वत्र स्वच्छता होती. मात्र, चुकून एका मशीनचा गंजलेला भाग स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष झाले होते. योगायोगाने त्याच ठिकाणी आबासाहेबांची नजर गेली. हे पाहून त्यांनी ते संबंधित अधिकाऱ्यांना रागावले. पण त्यांच्या त्या रागात क्रोध नव्हता – ममता होती, असे निरीक्षण त्या वेळचे एक अधिकारी नमूद करतात. त्यावेळी आबासाहेब म्हणाले, “मशीन ही आपली कामधेनू आहे. तिच्यामुळेच सर्वांची प्रगती होते. त्यामुळे तिची नीट निगा राखली पाहिजे.” कामगारांसाठी ‘गरवारे चॅरिटेबल ट्रस्ट’ सुरू करून आबासाहेबांनी कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अत्यंत मोलाची देणगी दिली. या उपक्रमामुळे अनेक कामगार असाध्य आजारांपासून बरे झाले आणि त्यांना जीवनाची शाश्वती लाभली. कामगारांच्या हिताकडे आबासाहेबांनी कधीही दुर्लक्ष केले नाही, हे विशेष महत्त्वाचे आहे.
त्यांचा विश्वास स्वदेशीवर होता. परदेशी उत्पादनतंत्राचा अभ्यास त्यांनी केला, परंतु परकीय कंपन्यांना रॉयल्टी न देता पूर्णतः स्वदेशी पद्धतीनेच उद्योग उभारले. त्यामुळे 'गरवारे उद्योग समूह' हे नाव राष्ट्रीय औद्योगिक धोरणाचे प्रतीक बनले. त्यांनी 'गरवारे मोटर्स', 'गरवारे प्लॅस्टिक्स', 'गरवारे नायलॉन्स', 'गरवारे पेन्ट्स', 'गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन', 'गरवारे वॉलरोप्स' अशा अनेक कंपन्या स्थापन केल्या. या सर्व प्रगतीच्या केंद्रस्थानी होते – कामगार आणि गुणवत्ता!