"माणूस पदव्यांनी किंवा किताबांनी मोठा होत नसून, स्वकर्तृत्वावरच मोठा होतो आणि मोठा व्हायलाच पाहिजे. राष्ट्रासाठी आपला काही उपयोग व्हावयाचा असेल, तर शेवटी उपयोगी ठरते ते फक्त कर्तृत्व आणि कार्य; पदव्या किंवा किताब नव्हे!"
- आबासाहेब गरवारे
"माणूस पदव्यांनी किंवा किताबांनी मोठा होत नसून, स्वकर्तृत्वावरच मोठा होतो आणि मोठा व्हायलाच पाहिजे. राष्ट्रासाठी आपला काही उपयोग व्हावयाचा असेल, तर शेवटी उपयोगी ठरते ते फक्त कर्तृत्व आणि कार्य; पदव्या किंवा किताब नव्हे!"
- आबासाहेब गरवारे
"माणूस पदव्यांनी किंवा किताबांनी मोठा होत नसून, स्वकर्तृत्वावरच मोठा होतो आणि मोठा व्हायलाच पाहिजे. राष्ट्रासाठी आपला काही उपयोग व्हावयाचा असेल, तर शेवटी उपयोगी ठरते ते फक्त कर्तृत्व आणि कार्य; पदव्या किंवा किताब नव्हे!" हे आबासाहेब गरवारे यांचे तत्त्वज्ञान होते.
उत्पादक व आर्थिक व्यवसायातील त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे आबासाहेबांचे मार्गदर्शन अनेक सरकारी व खाजगी संस्थांना लाभले. महाराष्ट्र राज्य फायनान्शियल कॉर्पोरेशनचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते. तसेच १९५६ ते १९६५ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्षपद भूषवले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक मंडळाचे ते उपाध्यक्ष होते, तर मुंबईतील स्थानिक संचालक मंडळाचे अध्यक्षही होते. टाटा, बिर्ला, बजाज अशा नामवंत उद्योगसमूहांच्या विविध संस्थांमध्ये त्यांनी अनेक वर्षे संचालक म्हणून काम केले.
स्वातंत्र्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने १९५९ मध्ये त्यांची मुंबईचे शेरिफ म्हणून नियुक्ती केली. हे पद एक सन्माननीय व अराजकीय स्वरूपाचे असते. दरवर्षी शहरातील एका प्रतिष्ठित नागरिकास हा सन्मान दिला जातो. शेरिफ ही औपचारिक स्वरूपाची जबाबदारी असली, तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची शिफारस व राज्यपाल यांची नियुक्ती या प्रक्रियेमुळे त्याचे महत्त्व अधोरेखित होते.
३१ जानेवारी, १९५९ रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या स्नेह-संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आबासाहेबांचा सन्मान करण्यात आला.
१९६१ मध्ये आबासाहेब यांनी महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्षपद भूषवले. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ (MEDC) या स्वायत्त संस्थेची स्थापना महाराष्ट्राचा समतोल व वेगवान सामाजिक-आर्थिक विकास साधण्यासाठी झाली. या संस्थेचे अध्यक्षपद लालचंद हिराचंद, एस.एल. किर्लोस्कर, केशुभ महिंद्रा, एन.ए. पालखीवाला, आदि गोदरेज, अशा अनेक मान्यवरांनी भूषवले आहे.
आबासाहेबांनी स्टेट बँक ऑफ इंडिया या संस्थेच्या संचालक मंडळावर अनेक वर्षें काम केले. आबासाहेबांनी संचालक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून देखील काही काळ काम केले. स्टेट बँक ऑफ इंडिया ही सरकार नियंत्रित संस्था असून संस्थेच्या संचालक मंडळावरील सभासदांची नियुक्ती केंद्रीय सरकारच्या संमतीने होते.
५ डिसेंबर १९७० रोजी नागपूर येथे भरलेल्या मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद आबासाहेबांनी भूषवले. मराठी विज्ञान परिषद, मुंबई, विज्ञानाचा प्रसार मराठी भाषेतून करणे, विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे इत्यादी विषयात कार्यरत आहे.
त्यांच्या सामाजिक आणि औद्योगिक योगदानाच्या गौरवार्थ भारत सरकारने १९७१ साली त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. ‘पद्मभूषण’ हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान असून तो "उत्कृष्ट दर्जाच्या विशेष सेवेसाठी" दिला जातो. हा पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केला जातो. ‘पद्मभूषण’ मिळाल्याची घटना देखील वाखाणण्याजोगीच आहे. सरकारदरबारी हा किताब मिळाला खरा, पण आबासाहेबांना त्याचे फारसे कौतुक वाटले नाही. “सरकारने माझ्या कार्याची दखल घेतली, एवढंच,” असं ते नम्रपणे म्हणत. त्यांनी ‘पद्मभूषण’ हा किताब कधीही कुठेही वापरला नाही. या गोष्टीकडे त्यांचा विशेष कटाक्ष होता.
२७ डिसेंबर १९७३ रोजी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे त्यांच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त आबासाहेबांचा सत्कार करण्यात आला. चर्चगेटजवळील के. सी. कॉलेज हॉलमध्ये आयोजित या समारंभास उद्योगपती, अर्थतज्ज्ञ, बँकर्स, तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींची मोठी उपस्थिती होती. किर्लोस्कर उद्योगसमूहाचे प्रमुख श्री. शंतनूराव किर्लोस्कर अध्यक्षस्थानी होते, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक प्रमुख पाहुणे होते. या समारंभाच्या निमित्ताने एक गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला.
मुंबईचे महापौर सुधीर जोशी आपल्या भाषणात म्हणाले, “परमेश्वर सर्वांना सारखी बुद्धी आणि संधी देतो, पण कोणती संधी उचलायची हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. कोणती संधी निवडावी हे आबासाहेबांनी नेमकं ओळखलं आणि ती उचलली.”
मुख्यमंत्री वसंतराव नाईक म्हणाले, “आबासाहेब धनवान आहेत म्हणून त्यांचा सत्कार होत नाही, तर ते कर्तृत्ववान आहेत म्हणून होतो आहे. त्यांचे उदाहरण समाजातील तरुणांसाठी मार्गदर्शक ठरावे, हे या सत्काराचे उद्दिष्ट आहे. एखाद्या व्यक्तीबद्दलचा आदर हा स्वयं-स्फूर्त असतो – आबासाहेबांच्या बाबतीत तो तसाच आहे.”
शंतनराव किर्लोस्कर अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “आबासाहेबांनी आपला व्यवसाय स्वतःच्या गुणांवर उभा केला. त्यांना कुणाचंही पाठबळ नव्हतं. व्यवसायातील यश हे श्रीमंती, राजकीय संबंध किंवा जातीय आधार यावर नाही, तर उद्योजकाच्या कौशल्यावर आणि दूरदृष्टीवर अवलंबून असतं. आबासाहेबांचे यश हे त्यांनी संपूर्णपणे उचित ठरवलेलं आहे.”
१९८९ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक स्टडीज, इंडिया (IES) या संस्थेने त्यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले. उद्योग व अर्थशास्त्र क्षेत्रातील मान्यवरांचा यामार्फत गौरव केला जातो.
१९८९ साली पुणे विद्यापीठाने (आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) त्यांना "डॉक्टर ऑफ लिटरेचर (D.Litt.)" या मानद पदवीने सन्मानित केले. ही पदवी साहित्य, सामाजिक किंवा सांस्कृतिक क्षेत्रातील अत्युत्कृष्ट योगदानासाठी दिली जाते. अशा व्यक्तींच्या कार्याचा बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर मोठा प्रभाव पडलेला असतो.
पुणे शहरात त्यांच्या नावाने अनेक संस्था व सार्वजनिक स्थळे स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये आबासाहेब गरवारे महाविद्यालय, आबासाहेब गरवारे कॉमर्स कॉलेज, गरवारे बालभवन, श्रीमती विमलाबाई गरवारे हायस्कूल, तसेच कौशल्यविकासासाठी स्थापन करण्यात आलेली गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट (GICED) यांचा समावेश होतो.
पुण्यातील डेक्कन जिमखान्याजवळील पुलालाही त्यांचे नाव देण्यात आले आहे. जनशताब्दी वर्षानिमित्त, २००४ मध्ये भारतीय टपाल विभागाने त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रकाशित करून त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला.