सन १९४७ पूर्वी सुरू झालेल्या प्लॅस्टिक उद्योगांनी पुढील दोन ते तीन दशकांत मोठी प्रगती केली. या यशामागे आबासाहेबांचे असामान्य नेतृत्व स्पष्टपणे दिसून येते. एवढ्या मोठ्या कार्य सिद्धीमागे त्यांच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण गुणांचा वाटा आहे. हाती घेतलेली कोणतीही गोष्ट ते अत्यंत हौसेने आणि मन लावून करत असत. त्या कार्यातून त्यांना आनंद मिळत असे. उद्योगधंद्यांमध्ये सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची त्यांची प्रेरणा उल्लेखनीय होती. त्या नवकल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळवण्याची त्यांची सततची धडपड विलक्षण होती. आबासाहेब म्हणजे जिद्द आणि चिकाटीचे मूर्तिमंत प्रतीक! एखादी गोष्ट मनाशी ठरवली की ती पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या कुठल्याही गोष्टीत त्यांनी कधीच तडजोड केली नाही.
एखादं नवीन उत्पादन सुरू करताना अनेक वेळा पुष्कळ माल खराब होतो, आणि प्रक्रियेमध्ये बराच वेळ जातो. अशा वेळी काही साधने बदलावी लागतात, कामाची पद्धत बदलावी लागते. अशा प्रसंगी परिस्थितीचं भान ठेवत आबासाहेब नेहमीच संयम राखत आणि कधीही नाराजी न दाखवता शांतपणे कामकाज पाहत असत. उलट, ते तिथे तासनतास थांबून कामगार व अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देत असत.
त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकलव्यासारखी अचल ध्येयनिष्ठा. हाती घेतलेल्या कामाचा सखोल अभ्यास करून, काम चालू असताना दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न जाता, पूर्ण एकाग्रतेने कामात गुंतण्याची त्यांची वृत्ती होती. कोणत्याही उपक्रमाची सुरूवात करताना त्यातील बारीकसारीक तपशील तपासण्याची त्यांची सवय होती. अत्यल्प वेळात मोठी कामं पूर्ण करायची असल्यास काटेकोर शिस्त आवश्यक असते आणि आबासाहेबांनी या शिस्तीची सुरुवात स्वतःपासूनच केली होती.
त्यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू व्हायचा. आदल्या दिवशीचे विविध खात्यांचे अहवाल वाचणे, इतर संस्थांच्या कामाचा आढावा घेऊन त्यावर सूचना देणे, हे त्यांचे नित्याचे काम होते. कित्येक वर्षे ते सुटीच्या दिवशीही काम करत असत. शिस्तीच्या बाबतीत ते स्वतःच्या मुलांनाही कुठलीही सवलत देत नसत.
आबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक मोठा पैलू म्हणजे मोठेपणाची, जबाबदारीची जाणीव त्यांनी अत्यंत सहजतेने आणि आनंदाने पेलली, आणि त्याचा भार इतरांवर कधीच पडू दिला नाही. अगदी सामान्य परिस्थितीतून आयुष्य सुरू केल्यामुळे सामान्य माणसांच्या अडचणी, गरजा, आणि मर्यादा यांची त्यांना पूर्ण जाणीव होती. त्यांच्या कार्याचा अफाट व्याप असूनही, त्यांची शांत आणि स्थिर चित्तवृत्ती ही अष्टावधानी व्यक्तिमत्त्वाचं एक उत्तम उदाहरण आहे.
आबासाहेबांचे फारसे औपचारिक शिक्षण झालेले नसतानाही, त्यांचे इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व वाखाणण्यासारखे होते. इतकेच नव्हे, तर औपचारिक करारांतील बारकाव्यांचेही त्यांना सखोल ज्ञान होते. आबासाहेबांना स्थापत्यशास्त्राचाही उत्तम अभ्यास होता. प्रकल्पांमध्ये लागणाऱ्या इमारतींच्या बांधकामात ते जातीने लक्ष देत.
व्यवसायात व्यस्त असूनही आबासाहेबांनी अनेक छंद जोपासले. त्यांना खेळांची विशेष आवड होती. ते स्वतः उत्तम बिलियर्ड्स आणि बॅडमिंटन खेळत, तसेच कधी टेनिसही खेळत. पोहण्याची त्यांना बालपणापासूनच आवड होती. नित्य व्यायाम हा त्यांच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग होता. घोड्यावर बसण्याचा त्यांना अनेक वर्षांपासून छंद होता. एकदा घोड्यावर बसून फेरफटका मारून आल्यावर त्यांना ताजेतवाने वाटायचे. तरुणपणी ते स्वतः फडात उतरून कुस्ती खेळत, आणि अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षिसेही मिळवली. शिकार हा देखील त्यांचा आवडता छंद होता. आबासाहेब ‘इंडियन म्युझिक सर्कल’चे अध्यक्ष होते. त्यांना शास्त्रीय संगीताची खूप आवड होती. त्याचप्रमाणे त्यांना बागकामाचीही विशेष आवड होती. अनेक ठिकाणांहून आणलेले उत्तमोत्तम गुलाब त्यांनी आपल्या कोरेगाव पार्कच्या बंगल्यात लावले होते.
पहाटेपासून दिवसाचा प्रत्येक क्षण धावपळीचा असला, तरी फुरसतीच्या वेळेत ते स्वतःला वेळ देत असत. जोंधळ्याची भाकरी आणि लसणाची चटणी – हे सर्व ते मोठ्या आवडीने आस्वादत. पुस्तकांचे अफाट वाचन, अभंग, भारुडे आणि इतर संगीत ऐकताना ते अनेकदा भावविभोर होऊन तन्मय होऊन जात. एवढ्या दीर्घ तपश्चर्येने राजर्षिपद मिळवून, सर्व सुखसुविधा हाताशी असूनसुद्धा कृष्णाकाठची ही थोर व्यक्ती 'माणूस' म्हणूनच कायम राहिली, असेच म्हणावे लागेल. आबासाहेबांचा समृद्ध अनुभव, राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेले त्यांचे मन, तरुण पिढीबद्दल असलेल्या त्यांच्या अपेक्षा, शिक्षणाविषयीचा खरा कळवळा आणि समाजऋण फेडण्याच्या कर्तव्यातून प्रकट झालेली त्यांची दातृत्व भावना — या सर्व गोष्टी निरंतर प्रेरणा देत राहणार आहेत.