वास्तविक पाहता आबासाहेबांचं ध्येय नोकरी करत राहणं हे कधीच नव्हतं. नोकरी करण्यामागे एकमात्र कारण म्हणजे व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान दहा हजार रुपये जमा करावेत, यानंतर सांगलीला परत जावं आणि तिथे आपलं एक दुकान काढावं. पण मुंबईतल्या त्यांच्या वास्तव्यामुळे कुठे, कसा आणि कोणता व्यापार चालतो, त्याची उलाढाल कशी होते, अशा गोष्टींची ओळख त्यांना झाली आणि मुंबईच्याच व्यापारी क्षेत्रात नशीब आजमावण्याचं त्यांनी ठरवलं. सुरुवातीला त्यांनी मोटार गॅरेजमध्ये गाड्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. गाड्या दुरुस्त करता-करता काही दिवसातच ते त्यात पारंगत झाले. वेगवेगळ्या कार-गाड्यांची माहिती त्यांनी करून घेतली. यानंतर त्यांनी वयाच्या केवळ सतराव्या वर्षी जुन्या कार-गाड्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि या व्यवसायामध्ये त्यांचा चांगलाच जम बसला. अल्पावधीतच आर्थिक परिस्थितीवर मात करण्यात ते यशस्वी झाले. गाड्या विकता-विकता गाड्यांचे सुटे भाग आणि टायर्सची विक्री सुरु केली. आबासाहेबांची विनयशीलता, प्रामाणिकपणा आणि सेवेची खात्री यामुळे मोठे उद्योगपती आणि राजकीय मंडळी गाड्या घेण्यासाठी यांच्याकडेच येत असत, त्यामुळे त्यांचा हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत गेला. आपल्या उद्यमशीलतेच्या माध्यमातून आणि कठोर परिश्रमातून १९२७-२८ साली वयाच्या २४व्या वर्षी गिरगाव येथे त्यांनी स्वतःची 'डेक्कन मोटर एजन्सी' स्थापन केली आणि कारमधील एक विश्वासार्ह डीलर म्हणून नाव कमावण्यात ते यशस्वी झाले.
आपल्या व्यवसायवाढीच्या दृष्टीने १९३३ मध्ये इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय कार व्यापारात आबासाहेबांनी आपला सहभाग नोंदविला. सदर भेटीदरम्यान त्यांना व्यवसायाबद्दलच्या अनेक चांगल्या कल्पना मांडण्याची आणि पुढे जाऊन अमलात आणण्याची संधी मिळाली. आबासाहेबांनी १९३७ साली 'गरवारे मोटर्स लिमिटेड' नावाची कंपनी स्थापन केली आणि या मराठी व्यक्तिमत्वाची एक वेगळी छाप उद्योग क्षेत्रामध्ये निर्माण झाली. आबासाहेबांचा व्यवसायातील उत्साह, चिकाटी आणि त्यांच्या कौशल्याची खात्री पटून अनेक संस्थानिक श्रीमंत ग्राहक त्यांचे मित्र, सहकारी, त्यांचे पाठीराखे बनले. सर्वांनाच एकरकमी किंमत देऊन जगप्रसिद्ध मोटार-गाड्या विकत घेणे शक्य नव्हते, तेव्हा हप्त्याने गाड्या विकण्याची संकल्पना त्यांनी उदयास आणली. त्यामुळे जवळपास सर्वच वर्गातील ग्राहकांना गाड्या घेणे शक्य झाले. यासाठी त्यांनी 'गरवारे फायनान्स कॉर्पोरेशन'ची स्थापना केली. आपला देश औद्योगिक दृष्ट्या इतर देशांच्या बरोबरीला किंबहुना त्यापेक्षा पुढे असावा असे त्यांना नेहमीच वाटे. त्यादृष्टीने आपण ज्या क्षेत्रात वावरतो त्या क्षेत्रात आपल्या देशाचे नाव कुठेही कमी होता कामा नये याची जाणीव ठेऊन आपली निर्मिती व इतरांशी होणारा व्यवहार हा भारताची पत वाढवणाराच राहील याकरिता ते सदैव जागरूक असत.
इंग्लंडमध्ये बरीच वर्षे राहिलेल्या एका ग्राहकाशी बोलताना, इंग्लंडमध्ये विशिष्ट मोसमामध्ये त्या ठिकाणचे लोक कमी भावात त्यांच्या मोटारी विकतात, हे त्यांच्या लक्षात आले. आबासाहेबांच्या जागरूक मनाने ते टिपले आणि या विशिष्ट कालावधीमध्ये परदेशात जाऊन त्या ठिकाणच्या गाड्या खरेदी करून भारतात विकू लागले. १९३३ मध्ये आबासाहेब इंग्लंडला गेले आणि कामासाठी जागोजागी हिंडले. इंग्लंडमध्ये स्नेह्यांच्या ओळखीने तेथील विदेशी मोटार कंपन्यांशी त्यांनी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित केले. ओळखी वाढवून घेतल्या. या काळात आबासाहेबांना ‘ड्यूक ऑफ वेल्स’ची जुनी जाडी विकत घेण्याचा योग आला. त्या गाडीची डागडुजी करून त्यांनी ती भारतात आणून विकली. अंगी असलेल्या साहसी वृत्तीमुळे त्यांनी १९३४ मध्ये लंडन येथे या कार्याकरिता एक कार्यालय सुरु केले. व्यापारी पत्रव्यवहार, आधुनिक व्यापार पद्धती या गोष्टी त्यांनी शिकवणी लावून साध्य केल्या, हे विशेष! भारतात मोटारी बनविण्याचा कारखाना असावा असे आबासाहेबांना नेहमी वाटायचे.
१९३५ मध्ये हिंदुस्थान सरकारने सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना याच विषयावर अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी अमेरिकेला पाठवले होते. विश्वेश्वरय्या सोबत आबासाहेब स्वखर्चाने अमेरिकेत गेले. यावरून आबासाहेबांची या विषयातली तळमळ दिसून येते. आबासाहेबांना या दौऱ्यात हेन्री फोर्ड यांच्याबरोबर चर्चा करण्याचा योग आला. प्रथितयश व्यक्तींच्या विचारांची त्यांना जवळून ओळख झाली. अमेरिकेहून परत आल्यावर आबासाहेबांनी भारतात मोटार निर्मिती करण्याबाबतचा अहवाल तयार केला. परंतु दुर्दैवाने सरकारी उदासीनता आणि तुटपुंज्या निधीअभावी तो प्रकल्प पुढे गेला नाही.
मोटारींच्या व्यावसायामध्ये आबासाहेबांनी नेहमीच नाविन्यपूर्ण गोष्टी अमलात आणल्या. त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय निवडताना आपल्या दूरदृष्टीच्या माध्यमातून भविष्याचा वेध घेण्यात ते नेहमीच यशस्वी राहिले. या व्यवसायात त्यांनी आपल्या जीवनाचे बरेच दिवस खरेच घालवले, पण पुढील व्यापक उद्योगी जीवनाचा पाया अशा रीतीने अधिक बळकट होत होता. या वेळेपर्यंत भारतात स्वातंत्र्यसूर्य उगवायचा बाकी होता, पण स्वातंत्र्याचे वारे मात्र वाहू लागले होते. अस्सल राष्ट्रीय विचारांच्या आबासाहेबांना स्वातंत्र्य प्राप्तीविषयी विलक्षण हुरहूर वाटत होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण आपल्या देशासाठी काहीतरी कामगिरी पार पाडली पाहिजे, असा नवा विचार त्यांच्या मनात घोळू लागला होता. पूर्वीच्या व्यवसायातून ते थोडेफार सुस्थिर झाले होते. अनुभव गाठीशी होता आणि बरीच माणसे जोडली होती.