आबासाहेब गरवारे
आबासाहेब गरवारे
महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रांत आबासाहेब गरवारे यांचे नाव आदराने घेतले जाते. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या भालचंद्र दिगंबर गरवारे यांनी आपल्या अथक परिश्रमाने, जिद्दीने आणि दूरदृष्टीने उद्योग जगतात एक अतुलनीय यश संपादन केले. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या, आणि कोणतीही गोष्ट मनोभावे आणि पूर्ण समर्पणाने करण्याची वृत्ती बाळगलेल्या आबासाहेबांच्या जीवनाची ही गाथा निश्चितच प्रेरणादायी आहे.
नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दृढ निश्चयाने १९२० मध्ये त्यांनी मुंबईच्या व्यापारी क्षेत्रात आपले नशीब अजमावले. सुरुवातीला मोटार गॅरेजमध्ये काम करत, गाड्या दुरुस्त करण्याच्या कामात पारंगत झाले. केवळ सतराव्या वर्षी त्यांनी जुन्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि त्यात चांगला जम बसवला. त्यांच्या विनयशीलतेमुळे, प्रामाणिकपणामुळे आणि सेवेच्या खात्रीमुळे मोठे उद्योगपती आणि राजकीय मंडळी त्यांच्याकडे गाड्या घेण्यासाठी येत असत. १९२७-२८ साली वयाच्या २४व्या वर्षी त्यांनी गिरगाव येथे स्वतःची 'डेक्कन मोटर एजन्सी' स्थापन केली आणि कारमधील एक विश्वासार्ह डीलर म्हणून नाव कमावले.
व्यवसाय वाढीच्या दृष्टीने त्यांनी १९३३ मध्ये इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय कार व्यापारात सहभाग नोंदविला. १९३७ साली 'गरवारे मोटर्स लिमिटेड' नावाची कंपनी स्थापन करून उद्योग क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडली. हप्त्याने गाड्या विकण्याची संकल्पना त्यांनी उदयास आणली. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनाही गाड्या घेणे शक्य झाले. 'गरवारे फायनान्स कॉर्पोरेशन'ची स्थापना याच उद्देशाने त्यांनी केली.
आबासाहेबांना भारतात मोटारी बनवण्याचा कारखाना असावा असे नेहमी वाटत असे. यासाठी त्यांनी १९३५ मध्ये सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्यासोबत अमेरिकेचा दौरा केला आणि हेन्री फोर्ड यांच्याबरोबर चर्चा केली. भारतात मोटार निर्मिती करण्याबाबतचा अहवाल तयार केला, पण सरकारी उदासीनता आणि तुटपुंज्या निधीमुळे तो प्रकल्प पुढे गेला नाही.
मोटारींच्या व्यवसायात नाविन्यपूर्ण गोष्टी अमलात आणताना, त्यांनी भविष्याचा वेध घेत नवीन व्यवसायांची निवड केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी नौदलासाठी प्लॅस्टिक बटणांची निर्मिती सुरू केली. महात्मा गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव होता आणि त्यांनी त्या विचारांचा स्वीकार केला होता. भारतामध्ये थर्मोप्लॅस्टिक उद्योगाची मुहूर्तमेढ रोवून, त्यांनी नायलॉन व सिंथेटिक फायबर क्षेत्रात यशस्वी प्रवेश केला. स्वातंत्र्योत्तर काळात 'हाउस ऑफ गरवारे' या नावाने त्यांची प्रगती भारताच्या औद्योगिक इतिहासात महत्त्वाची ठरली आणि ते प्लॅस्टिक उद्योगाचे अग्रणी ठरले!
६ जून १९५७ रोजी 'गरवारे नायलॉन्स लिमिटेड' ची स्थापना झाली. १९५८ मध्ये मुंबईतील वरळी येथे नायलॉन धागा आणि मोनोफिलामेंट्स तयार करणारा कारखाना सुरू झाला. त्यांनी १९६५ मध्ये स्वतःचे पॉलिमरायझेशन युनिट स्थापन केले आणि देशातच नायलॉन चिप्स तयार करण्यास सुरुवात झाली, ज्यामुळे आयातीवरची निर्भरता कमी झाली. पॅराशूटसाठी लागणाऱ्या दोऱ्यांच्या निर्मितीतून त्यांनी संरक्षण क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. 'गरवारे समूह' हा नायलॉन धाग्याच्या स्वदेशी उत्पादनातील अग्रणी ठरला आणि त्यांनी आयात पर्यायीकरणाला चालना दिली.
त्यांचा विश्वास स्वदेशीवर होता. परदेशी उत्पादनतंत्राचा अभ्यास करून त्यांनी स्वदेशी पद्धतीने उद्योग उभारले. त्यामुळे 'गरवारे उद्योग समूह' हे नाव राष्ट्रीय औद्योगिक धोरणाचे प्रतीक बनले. त्यांनी 'गरवारे मोटर्स', 'गरवारे प्लॅस्टिक्स', 'गरवारे नायलॉन्स' अशा अनेक कंपन्या स्थापन केल्या. या सर्व प्रगतीत त्यांच्या मागे कामगारांचे सहकार्य आणि गुणवत्ता होती.
आबासाहेबांनी कामगारांच्या कल्याणासाठी गांधीजींच्या विश्वस्त पदाच्या तत्त्वांचे पालन केले. त्यांनी आरोग्य, शिक्षण इत्यादी सामाजिक कारणांसाठी उदारहस्ते देणग्या दिल्या. 'महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (MES)' या संस्थेच्या कार्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी संस्थेला लक्षणीय अनुदान दिले. त्यांच्या योगदानाला आदराने गौरवण्यासाठी MES ने आपल्या एका प्रमुख संस्थेचे नाव बदलून 'आबासाहेब गरवारे कॉलेज' असे ठेवले.
आबासाहेबांचे असामान्य नेतृत्व, हौस, चिकाटी, नाविन्यपूर्ण कार्य करण्याची प्रेरणा आणि एकलव्यासारखी ध्येयनिष्ठा त्यांच्या यशामागे होती. नवीन उत्पादन सुरू करताना येणाऱ्या अडचणींच्या वेळी त्यांनी संयम राखला आणि कामगारांना प्रोत्साहन दिले. त्यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू व्हायचा. ते शिस्तीच्या बाबतीत अत्यंत कठोर होते. व्यवसायात व्यस्त असूनही त्यांना खेळांची, संगीताची आणि बागकामाची आवड होती. त्यांच्या पत्नी विमलाबाई यांनी आबासाहेबांना आयुष्यभर साथ दिली. कुटुंबाला एकत्र ठेवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता.
भारत सरकारने १९५९ मध्ये त्यांची मुंबईचे शेरिफ म्हणून नियुक्ती केली. १९५६ ते १९६५ मध्ये त्यांनी महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्षपद भूषवले. १९७१ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन सन्मान केला. हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान असून तो "उत्कृष्ट दर्जाच्या विशेष सेवेसाठी" दिला जातो. पुणे विद्यापीठाने १९८९ साली त्यांना "डॉक्टर ऑफ लिटरेचर (D.Litt.)" या मानद पदवीने सन्मानित केले.
आबासाहेबांनी देशातील उद्योग आणि उद्योजकतेबद्दल अनेक महत्त्वपूर्ण विचार व्यक्त केले आहेत. त्यांच्या मते, भारताच्या प्रगतीसाठी औद्योगिकीकरण अत्यंत आवश्यक आहे, पण तो विकास मानवी मूल्यांशी आणि सामाजिक बांधिलकीशी जोडलेला असावा. त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन, संधीची ओळख, कष्टाचे महत्त्व आणि व्यावसायिक दृष्टिकोन यावर भर दिला. शिक्षणाचे महत्त्व आणि उद्योगाशी समन्वय यावरही त्यांनी आपले विचार मांडले.
२ नोव्हेंबर १९९० रोजी आबासाहेबांनी जगाचा निरोप घेतला, पण त्यांचा उद्योगसमूह आणि त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या चार सुपुत्रांनी त्यांचा वारसा पुढे नेला. हे संकेतस्थळ आबासाहेब गरवारे यांच्या अविस्मरणीय जीवनाचा आणि कार्याचा लेखाजोखा वाचकांसमोर मांडतो. त्यांच्या जीवनातील संघर्ष, यश आणि सामाजिक बांधिलकी यातून आजच्या पिढीला खूप काही शिकण्यासारखे आहे. हे संकेतस्थळ वाचकांना उद्योग क्षेत्रात आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी निश्चितच मार्गदर्शन करेल.
संकेतस्थळाची रचना तीन विभागांत केली आहे. पहिल्या विभागात आबासाहेबांचे चरित्र सादर केले आहे. यात त्यांच्या जडणघडणीपासून मोटार व्यवसायातील प्रवास, नायलॉन उद्योगातील योगदान, स्वभाववैशिष्ट्ये, सामाजिक कार्य आणि त्यांना मिळालेला लोकगौरव या बाबींचा आढावा घेतला आहे. तसेच त्यांच्या पत्नी सौ. विमलाबाई आणि चार पुत्रांचे आबासाहेबांच्या यशातले योगदान यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. दुसऱ्या विभागात, आबासाहेबांनी विविध सार्वजनिक व्यासपीठांवर दिलेली निवडक भाषणे समाविष्ट केली आहेत. या भाषणांमधून त्यांनी सामाजिक, औद्योगिक व राष्ट्रीय विषयांवर व्यक्त केलेले विचार वाचकांपर्यंत पोहोचवले आहेत. तिसऱ्या विभागात, विसाव्या शतकातील देशातील औद्योगिक परिस्थितीचे स्वरूप व तत्कालीन उद्योगक्षेत्रातील घडामोडी उलगडून दाखवणारे लेख समाविष्ट केले आहेत. यामुळे वाचकाला त्या पार्श्वभूमीवर आबासाहेबांचे योगदान अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत होईल.